शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

शिवराज्याभिषेक

marathahand
तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’
        साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले.
        राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले. 

शिलालेख


राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " राजे तुम्ही सुखरूपविशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे." राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला .
        तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली "राजे आधी लगीनकोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. " राजे धळाधळा रडू लागले.
        साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले " राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? " राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात " हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको."

  • कृष्णाजी अनंत सभासद विरचित ‘शिवछत्रपतिंचे चरित्र.’ (छत्रपति शिवरायांचा प्रथम चरित्रकार) कलम ८७, राज्याभिषेक : त्याऊपर वेदमूर्ती गागाभट वाराणीसकर येऊन रायेगडी (रायगडावर) याहेस्वामीस (शिवाजी महाराजांस) मुंजी बंधन (मुंजकरून) पटाभेषक सिंहासनारूढ झाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे (संवत्सर) चैत्र सुध (शुद्धं) प्रतिपदा शुक्रवार.
  • मंत्री दत्तजी त्रिमल वाकेनिविस विरचित ’९१ कलमी बखर’‘शाके षण्णव बाण भूमि गणानादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त किर्ती महिते शुक्लेष सार्पे तिर्थो’।
  • रायगड निर्मिती समयी (राज्याभिषेकाचे वेळी) श्री शिवरायांच्या आज्ञेने रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादात लावलेल्या शिलालेखातील उल्लेख. अर्थ. असा, ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ गणल्या जाणार्याड अशा ‘शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्धं त्रयोदशी’ या शुभदिनी शिवरायांना राज्याभिषेक झाला. जेस्ष्ट श्रुध (शुद्धं) १२ श्रुक्रवार (शुक्रवार) घटी २१ पले ३४ वी ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्रं उरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ १० रबिलवल सु॥ खमस सबैन अलफ.- जेधे शकावली.
        श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना तिथीनुसार राजाभिषेक झाला.



छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड


 वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.
         छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.
 
हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार
रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक । तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।


         सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगडतोरणासिंहगड, पुरंदर, वज्रगड,प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.
          सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

शिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले!

शिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी स्त्रियांशी गैरवर्तन करणा-या गावाच्या पाटलाला थेट हातपाय तोडण्याची शिक्षा सुनावली होती... हा प्रसंग सविस्तर सांगणारे शिवाजी महाराजांचे सर्वांत जुने आणि अस्सल पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाचे अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना मिळाले आहे. पत्राच्या तारखेचे इसवी सनातील रूपांतर २८ जानेवारी १६४६ असे , असून त्यावर तत्कालीन मुद्रांनी शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे.

हे पत्र पाहण्याची संधी जानेवारी महिन्यात इतिहासप्रेमींना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द , त्यांची न्यायनिवाडा करण्याची पद्धती यावर तज्ज्ञांकडून अखंड संशोधन सुरू असून इतिहासाची पाने उलगडताना अनेक नवनवीन दस्तऐवज पुढे येत आहेत. पटवर्धन आणि कुलकर्णी या अभ्यासकांना सापडलेले हे पत्र मुळात मंडळातील संशोधक स. ग. जोशी यांना ८३ वर्षांपू
र्वी म्हणजे १९२९ मध्ये मिळाले होते. पुढे १९३० साली मंडळाने शिवचरित्र-साहित्य खंड दोन या पुस्तकात ते प्रकाशित केले ; मात्र , त्यानंतर दीर्घ काळ या पत्राचा ठावठिकाणा ज्ञात नव्हता. मात्र या दोघांना मंडळाच्या दप्तरखान्यातच अभ्यास करताना नुकतेच हे पत्र मिळाले असून ते जुनारी कागदावर लिहिलेले आहे. पत्र अत्यंत जीर्ण झाले असून त्यातील ७५ टक्के मजकूर वाचता येतो आहे , अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराजांच्या पत्राचा मराठी अनुवाद
राजश्री शिवाजी राजे यांच्या कचेरीतून खेडेबारे तर्फेचे कारकून, देशमुख व देशकुलकर्णी यांना शुहूर सन १०४६
जाणावे की- सदर तर्फेतील रांजे या गावचा मोकदम बावाजी भिकाजी गुजर हा सदर गावाची मोकदमी करीत असताना त्याच्याकडून काही बदअमल झाला. ही गोष्ट साहेबांना (म्हणजे शिवाजी महाराजांना) विदीत झाली. त्यावरून साहेबांनी हुकूम करून त्याला पकडून आणविले तेव्हा चौकशी केल्यावर ती गोष्ट खरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर बावाजी याची वंशपरंपरा मोकदमी सरकारात जप्त केली आणि बावाजीचे हातपाय तोडून त्याला मोकदमीवरून काढून टाकले. त्या वेळी सोनजी बजाजी गुजर हे त्या गोतातील म्हणून त्यांनी विनंती केली की बावाजीस माझ्या हाती द्यावे. ती विनंती विचारात घेऊन बावाजीला तीनशे पादशाही होन दंड ठोठावला. ते सोनजी याने देऊन बावाजीस हाती घेतले. बावाजीस संतान नाही आणि सोनजी हा गुजर कुळातील आहे म्हणून साहेबांनी मेहेरबान होऊन सदर तर्फेतील रांजे गावची मोकदमी सोनजी बजाजी गुजर याच्या हवाली करून त्याच्याकडून सरकारात दोनशे पादशाही होन शुल्क घेऊन त्याला मोकदमी दिली आहे. त्याला कोणी अडथळा करू नये. हे मूळ पत्र भोगवटय़ाकरिता त्याला परत द्यावे. आक्षेप घेऊ नये. सुरनिसांनी रुजू केले.

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा,

कायदा एकच तोँड वाजवून न्याय मिळत नसेल तर,
तोँडात वाजवून न्याय मिळवु, पण न्याय हा झालाच पाहिजे,
वाघ तर वाघच असतो, त्याचा कोणी वाणी नसतो,
पण महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो. त्याच्याच ह्द्यात फक्त शिवाजी महाराज असतो.
" जय भवानी जय शिवाजी

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२

talwar

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज


बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.
प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.
शिवाजीराजे व मुघल 
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले. 

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.....!! 

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

महाराष्ट्र माझा


या नावातच सारं काही आलं!
महाराष्ट्र !
या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!
इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!
Shivaji
ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?
जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका 'पोराने' पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले! पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंनगटातली!
जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!
इथला कोंकण किनारा,इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये...
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सर्व दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच!
Marathi Women
हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत!
इथली झणझणीत लावणी, खडे पोवाडे, कोळी गीत, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत सारी जगावेगळी!
भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला!
अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा!
मराठी साहित्य म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून भरलेली खाण आहे.
पु.ल. देशपांडे,कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणीमधली काही रत्ने!
विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक .... जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!
Pu.La.Deshpande
७०० पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते!
महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून सुंदर!
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली ,चिवडा, श्रीखंड सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृती लाभलेली आहे.
मुंबईचा वडा पाव,नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण,वडे-भात, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा,मिसळ, सातारी कन्दी पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी आणी मालवणी जेवण....अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत!
तर असा आहे आमचा महाराष्ट्र! कणखर आणि राकट तरी सर्वांस माया लावणारा आणि जपणारा!

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

अभिमान आहे मला मराठी असण्याचा...

मराठी भाषेची एक परंपरा आहे आणि या परंपरेने आपल्याला बरेच काही दिलेले आहे, सर्वगुणसंपन्न केले आहे. या मातीचे, या मातीतील माणसांचे ऋण आपण कोणत्याही जन्मात फेडू शकत नाही. पण एक काम मात्र करू शकतो, त्यांचा हा वसा जोपासण्याचे, त्याला पुढे नेण्याचे.
अभिमान आहे मला मराठी असल्याचा.. गर्व म्हणालात तरी चालेल.. का असू नये मला माझ्या भाषेचा अभिमान.. ज्या भाषेमुळे मी लिहायला, वाचायला शिकलो, घडलो, रूजलो, फुललो, बहरलो, मुरलो त्याचा अभिमान मला असायलाच हवा.. त्याउपर माझ्या मराठीतील महान व्यक्तींनी केलेले कार्य, त्यांचे विचार, दृष्टीकोन, संस्कार हे सारे संचित पाहिले तर आपण कुणापेक्षाही कमी नाही, उलटपक्षी वरचढ आहोत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. गुलामगिरी झुगारून स्वतंत्र होण्याची संकल्पना मांडली ती छत्रपती शिवाजी महाराजांनीच ना, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा त्यांनी फक्त विचारच केला नाही तर ते आपल्याला करून दाखवलेही त्यांचे गोडवे, पोवाडे गाऊ तितकेच कमी आहे. त्यांना लाभलेले मराठी मावळेही तितकेच महान. कारण एका माणसासाठी सारे काही झुगारून देण्याची वृत्ती त्यांनी दाखवली आणि महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त केले.
महाराष्ट्राला संतांचीही मोठी परंपरा आहे, त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ आजही आपल्या मनाला स्पर्शून जाणारी आणि विचार करायला लावणारी. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, बहिणाबाई ते गाडगेबाबांपर्यंत. त्यांचे विचार हे आजही आपल्याला स्फुर्ती देणारे, चिरतरुण असेच. काळ कोणताही असो, त्यांचा प्रत्येक शब्द आजही आपल्यासाठी लागू पडतो.
भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते बाबासाहेब आंबेडकर हे मराठीच ना, त्यांनी राज्याला नाही, तर देशाला दिशा दिली. मग सांगा, मराठी माणूस संकुचित वृत्तीचा कसा काय असू शकतो. ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांच्यामुळे तर आपण शिक्षण घेऊ शकतोय. टिळक, आगरकर, सावरकर या आणि यांच्यासारख्या अनेक महान मराठमोळ्या व्यक्तींमुळेच तर आपण स्वतंत्र उपभोगू शकतोय. पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला तो मराठमोळ्या आनंदीबाई जोशी यांनीच ना.
आज जे बॉलीवूड नावाने प्रसिद्ध आहे त्याची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळक्यांनीच रोवली. दुर्गाबाई खोटेंपासून ते नाना पाटेकर पर्यंत आजही मराठी माणसाने आपला ठसा चित्रपटसृष्टीतही उमटवलेला आहे आणि ही पावले आता हॉलीवूडच्या दिशेने निघालेली आहेत. ‘श्यामची आई’, ‘श्वास’ ऑस्करवारी करुन आले आहेत. ‘जोगवा’ सारखा मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची लयलूट केली आहे. बिग बी अमिताभ बच्चनलाही ‘विहीर’ सारखा मराठी सिनेमा काढावासा वाटतो. आपला पहिला‘मिफ्टा’ ही दुबईत झाला, अजून काय हवंय.

रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

शिवरायांचा त्रिवार जयजयकार…

मरणाला घाबरणारे आम्ही नाही
नेहमी मरणच घाबरल हिम्मतीला मराठ्यांच्या
साक्ष आहे त्या सह्याद्रीच्या कड्यांची
जिथे घोट घेतला मराठ्यांनी शत्रूंच्या नरडीचा
संतांनी आमच्यावर संस्कार केले
शिवाजी राजांनी आम्हाला हिम्मत दिली
शंभूराजांनी शिकवला स्वाभिमान मराठ्याचा
जिजावूंनी पाजले बाळकडू वीरपुत्र घडवण्याचे
जीवावर उदार झाले मावळे मराठी मातीसाठी
रक्ताचा अभिषेक केला राजांनी स्वराज्यासाठी
शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही
मराठी आम्हीरक्तच मराठी मराठीशिवाय जात लावत नाही
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही
सह्याद्रीपुत्र आम्ही उगाच कुणाच्या वाटेला जात नाही
आलाच जर कोणी आडवा उभा चीरल्याशिवाय सोडत नाही

काही मजेशीर व्याख्या

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना 

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे!


सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो"
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास

प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता


बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

स्वतंत्रता दिवस


आज ६5 वा  स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो  आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा होतो आहे   तर दुसरीकडे राजकीय प्रणालीचा  होत असलेला ऱ्हास भ्रष्टाचाराने बरबटलेला, राजकीय उदासीनता आणि अनेक समस्यानी घेरलेला देश दि
सतो आहे.   
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ६४ वर्षे झाली पण देशाची स्थिती जैसे  थे वैसे आहे. हो म्हणायला, आपण प्रगती पथावर आहोत पण आपली राजकीय परिस्थिती व नेते मंडळी  सर्व " मी, माझी माणस " अश्या  संकुचित बुद्धीने आपलाच देश गेल्या ६5 वर्षे  हळू हळु  पोखरत आणला आहे. एकालाही देशाची व जनतेचे भले करावे असे मुळी वाटतच नाही. त्या मुळे मोठ मोठे आर्थिक घोटाळे झाले. संसदेत कायदा करणारेच त्यास मोडीत काढीत आहेत.सरकारी यंत्रणेचा आपल्या मर्जी प्रमाणे उपयोग करून धन ,संपती गोळा करीत आहेत. आज पर्यंत या देशात बऱ्याच नेत्यांनी गैर मार्गाने संपती गोळा केली काहीची उघड झाली तर काहीची नाही. बरे ज्याच्यावर  आरोप पत्र दाखल झालेतरी अस्तित्वात असलेलेया कायद्या मधील चोर वाटा द्वारे व संसदेचे संरक्षण त्यामुळे एकाही मंत्र्यावर किवां संसद सद्श्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. हें आपले दुर्दैव आहे.