मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

मराठी भाषा दिवस


नमस्कार मित्रानो,

अकोल्यातील व सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. ....आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी 
धर्म पंथ जात एक जानतो मराठी 
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी 
बोलतो मराठी ऎकतो मराठी 
जानतो मराठी मानतो मराठी 


आमच्या मना मनात दंगते मराठी 
आमच्या रगा रगात रंगते मराठी 
आमच्या मना मनात दंगते मराठी 
आमच्या रगा रगात रंगते मराठी 
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी 
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥ 


आमच्या पिलापिलात जन्मते मराठी 
आमच्या लहानग्यात रांगते मराठी 
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी 
आमच्या घराघरात वाढते मराठी 
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी 
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी 
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी 
येथल्या नगा नगात गर्जते मराठी 
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी 
येथल्या वनावनात गुंजते मराठी 
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी 
येथल्या वनावनात गुंजते मराठी 
येथल्या तरुलतात साजते मराठी 
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥ 


येथल्या नभामधुन वर्षते मराठी 
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी 
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी 
येथल्या चराचरात राहते मराठी॥ 


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी 
बोलतो मराठी ऎकतो मराठी 
जानतो मराठी मानतो मराठी 
दंगते मराठी... रंगते मराठी.. 
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. 
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी ||

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

मराठी दम


सिद्धांत मुळ्येच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर वीर मराठीने रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात भोजपुरी दबंगला दोन विकेटने पराभूत केले. 

भोजपुरी दबंगने सुरूवातील फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या होत्या. भोजपुरी दबंगच्या १७५ धावांचा पाठलाग करताना मराठी टीमच्या सिद्धांत मुळ्येने १०३ धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. सामन्यात नाबाद १०३ धावा करणाऱ्या सिद्धांत मुळ्ये याला मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले. 
भोजपुरी दबंगचा कर्णधार मनोज तिवारी याच्या शानदार कामगिरीमुळे त्याला एफिशिएंट प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब देण्यात आला. तिवारी म्हणाला मला दुःख आहे की माझ्याशिवाय इतर कोणीही चांगली कामगिरी करू शकलं नाही. परंतु, पुढील सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू....

तर विजेता संघाचा कर्णधार रितेश देशमुखने सांगितले की, हा संपूर्ण संघाचा विजय आहे. रांचीतील प्रेक्षकांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल त्याने त्यांचे आभार मानले. 

समाजकारणात राजकारण

फोटोवर क्लीक करून फोटो पाहावा 
समाजकारणात आणि राजकारणात आमुलाग्र बदल आणण्याची टाप आहे ती फक्त मराठ्यातच,
मराठा एकी नाही, एकी नाही म्हणून उगाच बोंब ठोकनाऱ्यांनो,
निस्वार्थी भावनेची एकी आहे ती फक्त मराठ्यातच..
आम्हाला बाळकडू पाजलेले आहे ते ताठ मानेने जगायचे,
अरे रक्तातच ज्यांच्या सळसळती भावना कायम जागृत असते
अशा आम्हा मराठ्यांना आवाज नका देऊ,
मराठा शांत आहे म्हणूनच आज कित्येकांना पोळी भाजायला मिळत आहे,
"मराठा" नावावर राजकारण करणे सोडून द्या,
आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न करा, शेवटी आम्ही शिवरायांचे छावे आहोत,
कधीच वेगळे होऊ शकणार नाहीत असे आम्ही "मराठे" आहोत..
कर्म मराठा, धर्म मराठा, जात मराठा, बात मराठा..
जय मराठा, जयोस्तु मराठा..

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

आणखी एक बॉम्बस्फोट

आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला 
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला 
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला 
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां 
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला 
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला 
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला 
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला 
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां 
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला 

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३



१९ फेब्रुवारी - युगपुरुषाची ३८३ वी  जयंती.


छत्रपती शिवाजी - एक अलौकिक, असामान्य आणि अद्वितीय व्यक्तिमत्व !


सह्याद्रीच्या दऱ्या - खोऱ्यातून, रात्रीचा दिवस करून,  क्षणाचीही उसंत न  घेता या महाराष्ट्राच्या मातीसाठी, स्वराज्यासाठी लढणारा पराक्रमी योद्धा ! याच मराठी मातीतून ज्यांनी  एक एक मावळा जोडला आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले. स्वराज्यासाठी - गुलामगिरी मिटवण्यासाठी त्यांच्यातील स्वाभिमानाला कायम पेटते ठेवले. 

शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून या राजाने स्वराज्य स्थापन केले, स्वातंत्र्य म्हणजे काय याची पहिली जाणीव आमच्या रयतेला याच  राजाने करून दिली. हा स्वराज्य निर्मितीचा संघर्ष फार मोठा; अगदी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे संघर्षच !! सबंध आयुष्य स्वराज्य निर्मिती च्या कार्यामध्ये स्वतः कधी हि मखमली गालिच्यावर न झोपलेला, गड किल्ल्यांवर , उन्हा - पावसात , कडाक्याच्या थंडीत केवळ आणि केवळ घोडदौड.. हि घोडदौड स्वराज्य वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि  जास्तीत जास्त माणूस  जुलमी  सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीi.
राजे आपल्या याच मावळ मातीतील आपल्या रान गड्यान सोबत त्यांच्या प्रत्येक सुख - दुखामध्ये सामील होत, त्यांच्या मध्ये एक विलक्षण असे प्रेम आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. "शिवबा" या एका नावामध्ये एक अद्भुत अशी जादू होती कि तमाम मराठी माणूस एका आत्मविश्वासाने या नावामागे उभा राहू लागला. अति बलाढ्य आणि पराक्रमी शत्रू विरोधातही आपण दोन हात करू शकतो हि प्रेरणा त्यांच्या मध्ये निर्माण झाली. स्वराज्य तर निर्माण झाले पण ते प्रत्येकाला आपलेसे वाटावे म्हणून राजे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचे ! इतिहासात कधी हि न झालेली रयतेची कामे छत्रपतींच्या देखरेखीखाली पार पडली, स्वराज्य उभे राहू लागले, ते चौफेर वाढू लागले पुढे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी म्हणजेच संभाजी राजांनी हेच स्वराज्य चौपट वाढवण्याचे काम केले.आजच्या या प्रसंगी या महान आणि जाणत्या राजाची क्षणाक्षणाला आठवण व्हावी याचे कारण म्हणजे आज आमचा हाच महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय, पाण्यावाचून अक्ख गाव आणि गाव स्थलांतरीत होत आहे. शेकडो किलो मीटर केवळ ओसाड जमीन, जनावरांचे सांगाडे आणि कोरड्या पडलेल्या नद्या आणि नाले. हे भयंकर चित्र आहे महाराष्ट्रातील काही भागातले.

आज आपला देश बळीराजाच्या कृपेने अन्न धान्याच्या बाबतीत संपूर्ण आत्मनिर्भर आहे, कोट्यांनी धान्य  गोदामामध्ये पडून आहे परंतु स्वातंत्र्यानंतर प्रथमच हा पिण्याच्या पाण्यासाठीचा भयंकर दुष्काळ ओढवला आहे. अजून उन्हाळा सुरु व्हायचा आहे आणि थेंब भर पाण्यासाठी महाराष्ट्र तहानलेला आहे, जिथे माणसांची सोय नाही तिथे पाण्या अभावी, चाऱ्या  अभावी जनावरांचे काय हाल! 
एकीकडे एवढी गंभीर परिस्थती असतांना दुसरीकडे आमची सबंध राजकीय व्यवस्था हि या प्रसंगाचेहि  राजकारण करायला मागे पुढे पाहत नाहीये, ज्या शिवरायांच्या नावाने हे लोक राज्य चालवतात त्यांच्याकडून निदान थोडातरी आदर्श यांनी घ्यायला हवा.

काळ फार कठीण आहे,  या मातीवर आलेले संकट उलटवून लावण्यासाठी आता आपल्यालाच उभे राहावे लागेल. ज्या शिवरायांनी हे स्वराज्य स्थापन केले त्या मातीचे येणाऱ्या प्रत्येक संकटापासून सरंक्षण करणे हे प्रत्येक शिवरायांना मानणाऱ्या शिवप्रेमींचे कर्तव्यच. महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम  महाराष्ट्र आणि इतर काही भागात पडलेल्या दुष्काळा बाबतीत काही तरी ठोस करण्याची आज आपण शपथ घेऊ. थेंबभर पाणी वापरतांना देखील आपल्या दुष्काळी भावंडांचा निदान विचार तरी आपण करू शकतो. पाण्याचा अतिशय जपून वापर करून याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो. 

अगदी काल  पर्वाचा एक प्रसंग ; जालना जिल्ह्यातील लाडसावंगी या एका लहानश्या खेड्यातील एका शेत मजुराचा चिमुकला "अजय" या पाण्यासाठी टेंकर मागे धावतांना चाकाखाली चिरडून मारला गेला. आज गावागावा मध्ये हे भयाण चित्र दिसत आहे, पाण्यासाठी आमच्या बाया - बापड्या, लहान लेकरं, वयोवृद्ध नागरिक धावतांना दिसत आहेत, शहरातही काही वेगळी परिस्थती नाहीये.


आज माझ्या घरात व्यवस्थित पाणी येत आहे म्हणून मला काय त्याचे,  म्हणून या दुष्काळाकडे बघू नका ! आज दुष्काळ काही भागां पुरता मर्यादित आहे पण लवकरच याची झळ सबंध महाराष्ट्राला बसल्या शिवाय राहणार नाही. 
ग्रामीण - शहरी भागातील अडल्या - नडल्या साठी आप आपल्या परीने होईल ती मदत करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम  आपल्या सर्वांना करत आहे. 
छत्रपती शिवराय असंख्य संकटांना सामोरे गेले, त्यातून कित्येक वेळा बचावले ते केवळ आणि केवळ त्यांच्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या सोबतीने. 
याच शिवरायांचे आपण सर्व मावळे ! आज महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाला एकत्रित पणे सामोरे जाऊ. या प्रसंगाला निभावून नेण्यासाठी काय करता येईल या साठी तुमची बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक ताकद गरजेची आहे.